अशाच एका संध्याकाळी श्रद्धाच्या घरी--
डायनिंग टेबलवर कुटुंबातील सर्व सदस्य येतात..
" काय एव्हरीबडी, कसे काय सर्व? मजेत ना?"
" अहो बाबा,तुम्ही इतके निवांत कसे काय असू शकता?तुमचे तर रोजच सर्व वेळेत आवरते.शिवाय रेडी होऊन तुम्ही मला,रोहनला ,आईला सुद्धा सर्व ठीक ना ,मजेत ना अशी मस्करी करत छान वातावरण तयार करता! कस काय जमतं हो तुम्हाला हे सर्व? माझ्या मैत्रिणींचे बाबा तर त्यांच्याशी बोलत सुद्धा नाहीत.पण तुम्ही मात्र आजपर्यंत आई,रोहन आणि मला नेहमी क्वालिटी फॅमिली टाईम दिलात! "
"अग श्रद्धा कुठलीही गोष्ट सतत स्ट्रेस घेऊन सोपी कधीच बनत नाही. मग ते बाहेरचे काम असो नाहीतर घरातील. थोडे वातावरण हलके फुलके असेल की कुटुंबातील जिव्हाळा कायम राहतो."
" कुटुंबाबद्दल चे व्याख्यान झाले का साहेबांचे?"
" अग नेहा ,मी आपल्या श्रद्धा ला काही महत्वाच्या गोष्टी सांगत होतो .कालांतराने तिचे लग्न होईल,आणि दिल्या घरी वातावरण हलके फुलके करण्याची कला जर जमली तर सासरी सुद्धा ती माहेरी असल्यासारखी स्वच्छंदी राहू शकते ना!"
" हो बाबा नक्कीच! आईने सुद्धा असेच केले होते का लग्नानंतर आपले घरातील वातावरण असे आनंदी राहण्यासाठी?"
" काय ? तुझ्या आईने? छे ग, तिला तर मीच जरा जास्त मोकळीक दिली,म्हणून मॅडम मला ताब्यात घेतात."
" अहो काहीही काय बोलताय श्रद्धासमोर?नाही ग श्रद्धा तसे काहीही नव्हते.खर तर लग्नानंतर तुझ्या आजीची आणि माझी खूप छान गट्टी जमली होती.म्हणून मला आपोआप स्वच्छंदी वातावरण मिळालं होतं.तुझे बाबा तर तुला माहीतच आहे कसे आहेत ते,त्यामुळे अवास्तव बंधने माझ्यावर कधीच लादली गेली नाही.म्हणून घरातील वातावरण निर्मिती कुटुंबाच्या हातात असते आणि कोणी एक व्यक्ती एखादा सुखद बदल घडवण्यासाठी सुचवत असेल तर त्याचे स्वागत करून सर्वांना हितकर होईल असे जीवन कुठलेही कुटुंब आनंदात जगू शकते असे मला वाटते. पण श्रद्धा बेटा आताशी तर तुझी पदवी परीक्षा झाली आहे.तू एवढे प्रश्न का विचारते आहेस?"
" खर तर आई बाबा ,मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे."
" बोल ना बेटा !"
" बाबा कॉलेजच्या पहिल्याच दिवशी मी एका मुलाच्या प्रेमात पडले होते.तेव्हापासून आजपर्यंत आम्ही आमची मैत्री ,प्रेम विश्वासाच्या जोरावर टिकवली आहे.आम्ही एकमेकांशी पदवी परीक्षा झाल्यावर लग्न करू असे वचन दिले होते."
" अग श्रद्धा ,वेडी आहेस की काय तू? कोण कुठला हा मुलगा ,आणि तू त्याला थेट वचन देऊन टाकलस?"
" शांत हो नेहा तू! मी तिच्याशी बोलतो.नाव काय आहे मुलाचं?"
" गणेश सरपोतदार."
" एक मिनिट!म्हणजे आपल्या समाजातील कर्मकांडाला अत्यंत महत्व देणारे सुभाष सरपोतदार यांचा मुलगा का हा?"
" हो बाबा,बरोबर ओळखलत तुम्ही!"
" अग श्रद्धा बेटा,तो माणूस खूप शिस्तप्रिय आहे,शिवाय त्यांच्या घरातील स्त्रियांना कुठेही जास्त जाण्याची ,बोलण्याची मुभा नाही ,असे मी ऐकून आहे."
" मला माहित आहे बाबा ,सर्व."
" मग तरीही तू अशा कुटुंबात जायचं म्हणतेस?"
" हो बाबा.माझे आणि गणेशचे एकमेकांवर खूप प्रेम आहे.म्हणूनच मी त्याच्यासोबतच लग्न करणार आहे."
क्रमशः
©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे