उतारवयातील मानसिक वानप्रास्थ

...


"बरं झालं बाई आलीस गं, बघ या घरात या लोकांना माझी थोडीही किंमत नाही राहिली गं. कसं बोलतंय बघ ही. कालच माझ्या घरात आली आणि माझ्या पूर्ण घरावर कब्जा करून बसली". नंदाबाई सुनबाईकडे हात करून रागारागात बोलत नुकतेच घरात पाऊल ठेवलेल्या आपल्या लेकीला सान्वीला सांगत होत्या.

सान्वीने एक नजर वहिणीकडे टाकली आणि म्हणाली,"आई प्लीज तू थोडं शांत हो. असं त्रागा करून घेऊन तुलाच त्रास होईल. शांत हो".

तितक्यात वहिणी पाण्याचा ग्लास घेऊन आली आणि नणंदबाईच्या हातात दिला.

नणंदबाईने ग्लास हातात घेतला आणि वहिणीला डोळ्याने इशारा केला की तू काळजी करू नकोस, मी करते सगळ ठीक.

सान्वीने आईला पाणी पाजलं. पाणी पिल्यास नंदाबाई थोड्या शांत झाल्या. पाण्यामुळे सकाळपासून ओरडून ओरडून दुखणाऱ्या घसालाही थोडं आराम भेटला.

"आई, बोल आता काय झालं इतकं की सकाळपासून तू मला इतके कॉल केलेस?" सान्वीने शांतपणे आपल्या आईच्या समोर बसून तिचा हात हातात घेऊन विचारलं.

"सानू, मी स्नेहाला आज बोलें, स्नेहा पाडवा आला आहे तर किचनचे डबे घाण झाली आहेत घासून घे. तर त्यावर ती बोली, आई मला जमणार नाही. तुम्हांला ही होतं नाही काम आणि मलाही भरपूर बाकीचे काम आहेत. तसेही डबे स्वच्छच आहेत. आणि म्हणाली आई प्लीज नका इतकं लक्ष घालू प्रत्येक गोष्टीमध्ये उगाच तुम्हांला त्रास होईल ".

"सानू हे घर माझं आहे... माझं. ती मलाच म्हणते लक्ष घालू नको ". नंदाबाई रडू लागल्या.

सान्वीने आईला घट्ट मिठी मारली आणि पाठीवरून हळुवार हात फिरवू लागली. काहीवेळात नंदाबाई शांत झाल्या.

"आई, तुला आठवतंय लहानपणीच बाबा आपल्याला सोडून गेल्यानंतर तूच आम्हांला सांभाळलंस. पडेल ते आणि भेटेल ते काम केलंस, पण आम्हाला छान शिकवलंस.

आई तुला आठवतं तू त्या सुतार काकूंकडे काम करायची. कधी एक्सट्रा काम करण्यात आलं की त्या कामाच्या बदल्यात त्यांच्या इथले पुस्तक घेऊन यायची वाचायला ". सान्वी जुन्या आठवणींना उजाळा देत होती.

"कसं विसरेन मी. खूप काही शिकले तेव्हा. अनुभवाने तर शिकवलंच पण पुस्तकांनी पण भरपूर शिकवलं मला. तेव्हा वाचनाची आवड पण होती आणि त्या वाचनातून ज्या चार गोष्टी भेटत होत्या त्या,माझ्या मुलांना शिकवता यावं म्हंणून पण वाचत राहायचे ". नंदाबाई म्हणाल्या.

"आई, कुठे आहेत ते पुस्तक सगळी जे काकूंनी तुलाच दिली होती ". सान्वी

"आहेत की त्या कोपऱ्यातल्या पेटीत. थांब काढते ". नंदाबाई अगदी उत्साहने पेटीकडे धावल्या.

माय लेकीने जुन्या आठवणीचा पिठारा एकदाचा उघडला.

किती काय होतं त्यात. नंदाबाईच्या लग्नाच्या साडीपासून ते बाळांचे पहिले कपडे आणि त्याची आवडीचे पुस्तके.

खूप मायेने त्यांनी त्या पुस्तकांना हातात घेतलं आणि साडीच्या पदरानी पुस्तकावारची धूळ साफ केली.

डोळ्यात एक वेगळीच चमक होती त्यांच्या जेव्हा त्या पुस्तकं पाहत होत्या तेव्हा.

"आई, परत वाचन का चालू करत नाहीस तू?". सान्वीने आपल्या आईच्या चेहऱ्यावरचं समाधान बघून आईला म्हणाली.

"छे गं, आता कुठे वाचन होणार मला."नंदाबाई.

"आई, वानप्रास्थ म्हणजे काय माहिती का गं तुला?"सान्वीने आईला प्रश्न केला.

"हो माहिती, माझ्या सासूबाई सतत मला यावरूनच टोमणे मारायच्या. आमचं वय म्हणजे वानप्रास्थामध्ये जाण्याचं, चार दिवस देव देव करत देवाकडे जाण्याचं पण काय मेलं नशीब माझं ;सुन असली भेटली आहे की प्रत्येक गोष्ट शिकवावी लागते.

लोकांना वाटतं हिला संसार सुटत नाही पण त्यांना कुठे माहिती माझ्याशिवाय या घरात पान हालत नाही. त्यांनी कधी मला मोकळेपणाने काही करूच दिलं नाही. सतत दडपण, सतत काम, असो. वानप्रास्थ च काय म्हणत होती ". नंदाबाईंनी जुन्या आठवणींना पूर्णविराम देऊन,लेकीला प्रश्न केला.

"आई, वानप्रास्थ मानसिक ही असू शकत ना". सान्वी

"म्हणजे,समजलं नाही गं सानू मला". नंदाबाई

"आई, तुला आठवतं माझ्या लग्नाचे दोन वर्ष झाले आणि अचानक सासूबाईंनी सगळ्या गोष्टीमधून हात काडून घेतला. त्यात कश्यात त्या टोकायच्या ना काही बोलायच्या. बस मला जमेल तशी मदत करायच्या पण त्यांच्या वागण्यात एक अलिप्तपणा आला होता ". सान्वी

"हो, आठवतंय ना. किती रडली होतीस तू तेव्हा माझ्याजवळच. तेव्हा मीच तुला बोलें होते जाऊन डायरेक्ट बोल सासूला ". नंदाबाई

"हो ना. तेव्हा त्या मला म्हणाल्या होत्या. सानू आता तू घर, काम सगळं चोख सांभाळत आहेस आणि असेही हा तुझा संसार आहे, तुझ्या पद्धतीने करू द्यावा म्हणून मी थोडी मनाने दूर झाले. सतत लुडबुड करू लागले तर तुझीही घुसमट होईलच ना. म्हणून म्हंटल मानसिक वानप्रास्थ घेऊन बघावं. जेव्हा गरज लागलं तेव्हा मी आहेच गं. पण तू असंच का केलेस, तू तशीच वागली, तू हाच ड्रेस घातलीस यात अडकून नव्हतं पडायचं मला.

आणि मलाही माझे काही स्वप्न आहेत, मैत्रिणीसोबत फिरणं, सत्संग ते ही पूर्ण करायचं आहे". सान्वीच्या सासूबाई सानुला त्याची बाजू समजावून सांगत होत्या.

"वाईट वाटून घेऊ नको सानू, बरेच वेळा माझं घर म्हणत सासू बनल्यास नकळत पणे आपण आपल्या सुनेवर अत्याचार करतो, तिचं स्वातंत्र्य हिरावून घेतो, तिचे विचार दाबून टाकतो, थोडक्यात काय तर आपण आपल्या मनातील सुनेची प्रतिमा तिच्यावर लादतो आणि ती बिचारी त्या खाली दबत जाते आणि काही दिवसांनी आपलं नातं ही सासू सुनेचे ते ही दबून जातं.

समाजात सासू सुन नातं फारच विचत्र प्रकारे मांडलं गेलं आहे आणि काही जागी तश्या सासू आहेतही. माझ्या सासूबाईही खूप त्रास द्याच्या मला तेव्हाच ठरवलं. आपण आपली सुन आल्यास वानप्रास्थ आश्रमात जाऊन राहायचं किंवा मग घरातच मानसिक वानप्रास्थात राहायचं". सासूबाई बोलत होत्या आणि सासूबाईंचे विचार ऐकून मात्र सानूचे डोळे वाहत होते.

स्वतःला खूप जास्त भाग्यशाली समजतं होती की तिला अश्या विचारांची सासू भेटली.

"आई मी म्हणत नाही तू सासूबाई सारखी बन किंवा कर पण तुझ्या आवडी निवडी आमच्यामुळे तुला पूर्ण करता नाही आल्या त्या आता पूर्ण कर". सान्वीच बोलणं ऐकून नंदाबाई मात्र विचारात पडल्या.

नंदाबाईंचा राग आता बराच निवळला होता.

जेवणाची वेळ झाल्यामुळे स्नेहा दोघींना बोलावण्यासाठी आली होती.

"आई, ताई जेवण तयार आहे चला जेवू या ". स्नेहाने कचरतच सासूकडे पाहत म्हणाली.

"घे ताट आम्ही आलोच ". नंदाबाईच्या या वाक्यावर दोघी नणंद भावजय एकमेकींकडे बघू लागल्या. कारण प्रत्येक वेळी भांडण झाल्यास नंदाबाई किमान दिवसभर तरी जेवण बिलकुल करत नव्हत्या पण या वेळेस लगेच तयार झाल्या.

सगळ्यांनी मिळून जेवण केलं आणि लेक तिच्या घरी निघून गेली.

नंदाबाई त्यांच्या रूममध्ये आल्या आणि त्यांनी त्यांची सगळी पुस्तके काढून स्वच्छ करून घेतली पण तीस वर्षांपूर्वीच सगळी. वाळवी लागून काही पान खराब झाले होते तर काही फाटले होते. त्यात मेनका नावाच्या मॅगझीनही होत्या.

त्यांनी मनाशी ठरवलं, जमेल तसं पुस्तक वाचायला चालू करू.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून त्या बाहेर फिरायला गेल्या. बाहेर पडल्यानंतर त्यांना आणखीन सकारात्मक वाटु लागलं. लेकीला बाहेरूनच फोन केला आणि सांगितलं त्यांचा साठी छान छान पुस्तके पाठवायला.

पुढच्या चार दिवस त्या शांतच होत्या पण या चार दिवसात त्या मंदिरात रोज जात होत्या, रोज सकाळ सायंकाळी चालायला जात होत्या त्या निमत्ताने दोन चार त्यांच्याच वयाच्या मैत्रिणी भेटल्या.

बाहेरून आलेलं पार्सल पाहून तोंड बनवून, तोंडाचा पट्टा चालू करणाऱ्या नंदाबाई आज आलेलं पार्सल उघडण्यासाठी अतिशय आतुर होत्या.

लेकीने चार पुस्तक पाठवली होती.

अमृतवेल (वि. स. खांडेकर ),

असीम प्रेम की ओर (सिस्टर बी. के. शिवानी )

यू कॅन हील युअर लाईफ मराठी (लुईस एल )

आयुष्याचे धडे गिरवताना (सुधा मूर्ती )

नंदाबाईने हळूहळू सुनेच्या संसारातून मन बाहेर काढून घेतलं आणि पुस्तक, सत्संग, स्वतःची तबियत, व्यायाम आणि नातवंड यामध्ये गुंतवलं.

हळुहळु त्यांना त्यांच्या वागण्याचा वाईट वाटत होतं. पण म्हणतात ना देर आये दुरुस्त आये, तसेंच काहीसं फायनली, नंदाबाईंनी मानसिक वानप्रास्थ घेतला.

भरपूर आयुष्यामध्ये स्वतःचेच अनुभव आपल्यला शिकवतात असं नसतं. पुस्तक ही अशी गोष्ट आहे जे मन लावून वाचल्यास आपल्याला भरभरून अनुभव देते.

उतारवयातही बायका संसार सोडत नाहीत मग हेच चुकलं,तेच चुकलं, हेच केलं, तेच केलं असं करत स्वतःच बीपी मात्र वाढवून घेतात.

मानसिक वानप्रास्थ घेतल्यामुळे सुन, मुलगा यांना मोकळा श्वास भेटेल म्हणून नाही तर उतारवयात त्यांना स्वतःला या रोजच्या कटकटी पासून सुटका भेटल शिवाय आयुष्यभर ज्या गोष्टीसाठी मन मारून जगलो आणि शरीरही झीजवलं त्या आपल्यामधल्या मनाला आणि आपल्या शरीराला आराम भेटावा म्हणून सगळ्यामध्ये राहूनही अलिप्त राहायला हवं.

मला वाटतं उतारवय म्हणजे 'आयुष्यभर केलेल्या कष्टाचं फळ खाण्याची वेळ '

नातवंडसोबत हसत खेळत जगायचं, मुलांचा संसार त्यांना त्यांच्या परीने करू द्याचा, कुठे चुकत असेल तर त्यांना समजावून सांगायचं.

काही चुकीचं लिहलं गेलं असेल तर माफ करा. 

थँक्स

उषा