#वर्गमित्र-18
"हॅलो सखीऽऽऽऽऽऽऽ!!!!"
"कुठे आहेस?"
"वेळ आहे का बोलायला?"
"Am so so happy today.want to share with you ."
प्रसादचे मेसेजेस बघून आश्चर्यच वाटले.
हा सूर्य असा पश्चिमेकडून कसा उगवला आज.!!
मी मनातल्या मनातच विचार करून हसायला आले.
हसायला ह्यासाठी की मी ज्याला सूर्य म्हणले होते मूळात तो स्वभावाने अतिशय शांत,शीतल चंद्रासारखा.
कधी कधी मीच सूर्याचा तापटपणा दाखवायचे पण त्याने कधीही राग केला नाही की चिडून नाराज होवून बोलायचेच नाही असे केले नाही.
उलट शांतपणे ऐकून मलाच हसवून शांत करण्यात पटईत.
पण हा रवी मात्र आज शशी बनून पश्चिमेकडून उगवला होता हे नक्कीऽऽऽ
# ## ## ## ## #
आज एक ऐकून बरे वाटले की त्याच्याकडे काहीतरी खूप छान बातमी होती.
कित्येक दिवसांनी आज त्याला इतके आनंदी बघत होते मी.गेल्या काही दिवसापासून सतत तणावात असलेला माझा मित्र आज वेगळ्याच उत्साहात दिसत होता.
मलाही कधी एकदा फोन करू असे झालेले.
पण म्हणतात ना,
'नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न'
तसा आजचा दिवस.
असे मला भविष्य जरी कोणी सांगितले असते ना तरी मी विश्वास ठेवला नसता.
पण पूढला अख्खा दिवस ज्या पद्धतीने घडामोडी घडत गेल्या वाटलेच नाही की आज असेही काही घडेल.
नेमके जेव्हा अशी काहीतरी घाई असते ना,कोणीतरी य़ेते किंवा मग कामात काम असे काही वाढत जाते ना,
ह्याला आजचा दिवस तरी कसा अपवाद असणार!
माझे हातातले काम संपवून फोन हातात घ्यायला श्रीचा फोन.
कसलेसे कुरीअर पार्सल येणार होते ते चुकून दूसऱ्याच पत्त्यावर पोहोचवले होते डिलिव्हरी बॉयने.
ते आता मला कलेक्ट कर म्हणत होता श्री.
"ए मी नंतर जाईन ना श्री,मला ना एक अर्जंट कॉल करायचाय रे प्रसादला."
"अग् नाही ग ज्याच्या घरी पडलेय त्यांना घाईने बाहेर जायचेय म्हणे."
"ते आपल्यासाठी थांबताएत."
"आपल्यामूळे कोणी ताटकळत नको बसायला."
"तू आधी निघ."
मग काय नवरोबाची आज्ञा शिरसावंद्य मानून जराशा नाखूषीनेच निघाले.
सखू आली होती म्हणून बरं.ती आता मूलांकडे बघेल.मला तासभर तरी लागणारच होता.
"ताई,मला पुन्यांदा पुढल्या घरला जायचेय कामाला"
किती येळ थांबू मी?
अग् मी लवकर येते. तरीही तूझे काम झाले की सगळे दरवाजे लावून मूलांना दार बंद करायला सांगून तू जा.
"वेळ असेल तर थांब मी येइ पर्यंत."
# ## ## ## ## #
वृंदावन गार्डन हाईट्स च्या 23 व्या मजल्यावर मूर्ख माणसाने फक्त आडनाव आणि फ्लॅट नंबर सारखा म्हणून तिकडेच पार्सल टाकून गेला होता.
ते काका काकू माझीच वाट पहात होते.वयस्कर मंडळी पाहून नकळतच मी नमस्कार केला दोघांना. कुरीअरवाल्याच्या चूकीमूळे हा त्रास झाला आणि तुम्हाला वाट पहावी लागली म्हणून मी पून्हा त्यांची क्षमा मागीतली.
साहजिकच स्रीसुलभ कुतूहलापोटी काकूंनी माझी माहेर काय,कुठले चौकशी केली.मी साताऱ्याची म्हणल्यावर काकुंचे डोळे चमकले.त्यांचे माहेर पण साताऱ्याचे.
मग आई बाबांचे नाव गाव काय करतात सगळ्या चौकशा झाल्या.तेव्हा कळले की काकूंच्या माहेरहून पण आमची जवळची ओळख निघाली.
काकूंचे नाव वसूधा पेंडसे.आम्ही पेडणेकर.काकू आणि माझी आत्या क्लासमेट्स निघाल्या.मग काय गप्पा इतक्या रंगल्या की काकुनी मला क्षणात भाच्चीच बनवून टाकली त्यांची.अर्थात दोन बायका बोलायला लागल्यावर जे व्हायचे तेच घडले.त्यांचा बाहेर जायचा प्लॅन बोंबलला होता आणि काका एव्हाना जवळच्या दिवाणावर मस्त घोरासूराचे आख्यान लावून बसले होते.
जे काम पंधरा मिनिटात उरकायचे तिकडे दीडतास गेला.मलाही तेव्हा लक्षात आले जेव्हा त्यांच्या भिंतीवरचे लोलक घड्याळ दिड वाजल्याचा टोल दिला.गेला तासभर मी तिकडेच होते.
कसेबसे पून्हा येते,भेटूया,
काकू तुम्ही दोघे आता एकदा जेवायलाच या घरी असे निरोपाचे बोलत फोन नंबर पत्ता सगळ्याची येथेच्छ देवाणघेवाण करत मी पाय काढता घेतला.
हूश्श!खाली आले गाडीला किक मारली अन् थोडे पूढे जातेय तोच काकूंचा फोन.
गाडी बाजूला लावत मी फोन घेतला.
"अग् आशू, तू पार्सल इकडेच विसरलीस की.!"
अरे देवा!! गप्पांच्या नादात ज्यासाठी आले तेच विसरले.
किती बाई वेंधळेपणा!!
चरफडत स्वत:लाच चार शीव्या(मनातल्या मनात)
घातल्या आणि वळवली गाडी.
बिचाऱ्या काकू खाली येवून थांबल्या होत्या माझी वाट पहात पार्सल घेवून.
त्यांना मधाळ स्पेशल ठेवणीतले पेडणेकरी हास्य आणि थँक्यू फेकतच गाडी जोरदार पळवली घराच्या दिशेने.
अर्ध्या रस्त्यात गाडी रिझर्व्ह वर आलेली इंडीकेटरवर दिसली म्हणून पट्रोल पंपावर गेले तर तिकडे ही गर्दी.
आजचा दिवसच खराब साला.
इतकी वैतागले होते पण पर्याय नव्हता.
पेट्रोल भरून गाडी पून्हा अक्षरश: पिटाळली.
घरी पोहोचले तर तिकडे नविनच घोळ झालेला.
घरातच खेळा बाहेर जावू नका असे सांगितल्यामूळे मूले घरातच बॅटबॉल खेळताना बॉल भिंतीवरच्या फ्रेमला लागून ती फूटली होती.त्याच्या काचा घरभर पडल्या होत्या आणि मला कळू नये म्हणून घाईघाईत साफसफाई करण्याच्या प्रयत्नात धाकट्या चिरंजींवानी बोट कापून घेतले होते.
सोहम् ने डेटॉल लावून मलम लावले होते पण दोघेही घाबरले होते मी काय म्हणते ह्या विचारांनी.
आता मला त्यांचे उतरलेले चेहरे बघून त्यांना रागवावे की जवळ घेवून कोकरांची समजूत घालावी हेच कळत नव्हते.
ह्या नादात प्रसादशी बोलण्याचे मी विसरून गेले.
जेवणे उरकून ऋषीला घेवून आधी फॅमिली डॉक्टरकडे गेले.टिटानियसचे इंजक्शन दिले.
येताना आईसक्रीम घेवून घरी आलो.
खूप दमायला झाले होते.
"घेणे ना देणे,तेल लावणे " म्हणतात ना तशी अवस्था झाली होती आज.
थोडीशी डूलकी काढू म्हणून पडले तर झोपच लागली गाढ.
कसल्याशा आवाजाने घाबरूनच जागी झाले.बेल वाजतीय श्री आला की काय!
किती झोप लागली अशी अवेळी?
मनात पुटपूटतच दार उघडले.दारात कोणीच नव्हते.मग काय वाजले.?
अरे देवा! माझा अलार्म फोनचा.
6 वाजल्याचा अलार्म वाजत होता.अलार्मचे तोंड दाबले अन् फोन कडे बघीतले तर एक फोनही येवून गेला होता प्रसादचा.
त्याला उद्या बोलते असे सांगू हा विचार करेपर्यंत श्रीचा फोन...
"अग् ,पार्सल कलेक्ट केलेस का?"
"हो श्री.आणलेय."
"अग् मग कधी सांगणार.मी इकडे वाट पहात होतो तुझ्या फोनची."
"बर ठिक आहे.बोलू नंतर."
सगळे एका दमात बोलून श्रीने फोन ठेवलाही.
# ## ## ## ## #
जेव्हा एखाद्याशी खूप उत्कटतेने बोलायचे असते नेमके तेव्हाच अशा काही अडचणी गोफ धरून नाचायला लागतात की चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूगत आपली अवस्था होते.
कदाचित ती वेळ आपल्यासाठी योग्य नसावी म्हणून ह्या अडचणी आल्या असाव्यात अशी मनाची समजूत करून घेतली.
# ## ## ## ## #
कडक चहाची फार गरज होती आत्ता ह्याक्षणी.
प्रचंड डोके दूखत होते आज.
# ## ## ## ## #
(क्रमश:18)
®©राधिका कुलकर्णी
-------------------------------------
नमस्कार मंडळी,
कसा वाटला हा भाग?
वर्गमित्र कथा आवडतेय की नाही ?
हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.)
धन्यवाद.